अलव्य (अति लघु व्यथा)

ते तिघे!

शनिवार… भीक्षेकरी तपासत एका स्पॉट वरून दुसऱ्या स्पॉट कडे जात असताना सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं. तिथं एक माणूस दयनीय अवस्थेत पडला होता, पडल्या पडल्या वारंवार गुडघ्याला हात लावून विव्हळत होता… रडत होता. मी नीट पाहिलं, अर्रे, हा तर तोच… पूर्वी वाढपी म्हणून एका ठिकाणी काम करायचा… कोविड काळात नोकरी गेली… रस्त्यावर आला… अन्नपूर्णा प्रकल्पात याला डबे वाटण्याचं काम देऊन पगार सुरू केला होता.

मागच्या वर्षी केवळ वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण गेले होते. हा तसा धट्टाकट्टा! मी याला म्हटलं होतं, “समाज आपल्याला “भीक” देऊन जगवत आहे… चल, आज समाजाला गरज आहे… आपण समाजाला “रक्त” देऊन “दान” करू… समाजाला परतफेड करू… हा चटकन तयार झाला होता. याने माझ्या शब्दावर तेव्हा रक्तदान केले होते. कोरोना ने आजारी असलेले, तीन अतिगंभीर रुग्ण, ज्यांना रक्ताची आत्यंत्यिक गरज होती, परंतु कुठेही रक्त उपलब्ध होत नव्हतं… हे तीनही रुग्ण याने केलेल्या रक्तदानामुळे तेव्हा वाचले होते.

मी गडबडीने उतरून याच्याजवळ गेलो. मला पाहून त्याने हंबरडा फोडला… मी गुडघा पाहिला… गुडघ्याचा आकार चित्रविचित्र झाला होता… गुडघ्याच्या हाडांचे तुकडे तुकडे झाले असणार, हे लगेच लक्षात आलं.
“गाडीनं उडवलं सर, मी दोन दिवस इथेच पडून आहे, मला वाचवा सर… खूप दुखतंय ओ, या दुखण्यातून मला मोकळं करा सर…”
त्याला भयानक यातना होत असणार… त्याच्या ओरडण्यातून, रडण्यातून या सर्व वेदना प्रत्यक्ष दिसत होत्या… कागदावर चित्र दिसते तसे! त्याच्याकडे बघवत नव्हतं… तो गुडघा पकडून रडत होता. मोठी माणसं रडताना खूप भेसूर दिसतात!

आपलं काही दुखत असतं.. आपण कळवळतो… तेव्हा होते ती “वेदना”… परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती “संवेदना”! आज जरी हा स्वतःच्या वेदनांनी तळमळत होता… तरी कधी एकेकाळी… दुसऱ्यांच्या वेदना समजून घेऊन, याने रक्तदान करत, तीन जणांना जीवदान देऊन संवेदना जपली होती. आज याच्या वेदनेवर फुंकर मारणे हे माझं काम होतं!

यापुढे उशीर न करता, रिक्षात घालून त्याला मॉडर्न ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये एडमिट केलं. उपचार सुरु झाल्यानंतर, काही वेळातच वेदना थांबल्या. पायाला प्लास्टर घातलं गेलं… आता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्याला भेटायला गेलो… डोळ्यात पाणी… चेहर्‍यावर हसू…

दोन्ही हात जोडत म्हणाला, “सर, तुमी मला वाचवलं… नाय तर मेलो असतो रस्त्यावर!” जोडलेले त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याच्या कानाजवळ जात म्हणालो, “तुला एक गंमत सांगू का? तुला मी वाचवलं नाही… तुला वाचवलं त्या तिघांनी… ज्यांना, कधी काळी तू तुझं रक्त देऊन वाचवलं होतंस!”

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले… जणू अविश्वासाने तो माझ्याकडे पाहत होता…
गालावर हळूच चापटी मारत त्याला म्हटलं, “बघतोस काय असा येड्या माझ्याकडं? दुसऱ्याला जगवणारा, स्वतः कधी मरत नसतो!”
त्याने शून्यात कुठेतरी पाहत पुन्हा हात जोडले…

हा नमस्कार होता, त्या “तिघांना”!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*