15 ऑगस्ट, माझाही स्वातंत्र्य दिन!

15 ऑगस्ट!

हि नुसती तारीख नव्हे, आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस!
याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता, आणि एकेवर्षी मी सुद्धा!
भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि मी माझ्याच!

सुरुवातीला इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख होतो. महिन्याचं उत्पन्न 4 – 5 लाख! पण यांतही समाधानी नव्हतो! भरपूर पैसे कमावणे, वर… वर… वर जाणे.. आणखी वरचे पद मिळवणे! घर गाडी बंगला घेणे… आज महाराष्ट्र प्रमुख आहे, उद्या भारताचा प्रमुख होणे, जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे! जग जिंकायला निघालेला सिकंदर होतो मी! फरक इतकाच, तो सिकंदर घोड्यावर होता, आणि दिडशहाणा मी गाढवावर!

हे गाढव मीच होतो आणि गाढवावर बसलेला दिडशहाणाही मीच! एके दिवशी, आयुष्याच्या वाटेत भेटलेल्या भीक मागणाऱ्या एका आजोबांनी या दिड शहाण्या सिकंदराची नशा उतरवली!

माणूस म्हणून जगण्याचे सूत्र सांगितलं! ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि इतर कुठल्याही पॅथीपेक्षा Sympathy आणि Empathy (अनुभुती आणि सह-अनुभुती) या पॅथी वापरणं हे माणुस असल्याचं लक्षण असतं हे त्यांनी माझ्यावर ठसवलं! वेद शिकण्यापेक्षा एखाद्याची वेदना समजून घेणं, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण, हे त्यांनीच मनावर बिंबवलं!

“डोंगरावर चढणार्‍या माणसाचे पाय ओढुन त्याला पाडण्यापेक्षा, जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात ओढुन त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ असतो” पुरुषार्थाची व्याख्या नव्यानं त्यांनी मला सांगितली!
ते खरंतर भिक्षेकरी नव्हते, ते उच्चशिक्षित होते. या गोड व्यक्तीमधुन मधुर रस चावुन चावुन ओरबाडुन घेवुन उसाच्या चोयटीसारखं त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना रस्त्यात फेकलं होतं!

बाबांनी सांगितलेल्या त्या बाबी त्यावेळी कानात आल्या होत्या… पण मनात नाही!
मी धावत होतो शर्यतीत! शर्यतीची नशा होती! पैसे… पद… प्रतिष्ठा… मी एकेक गड जिंकत चाललो होतो… पण मन भरत नव्हतं!
हे सगळं कमावून झाल्यावर एके दिवशी भेटायला गेलो त्यांना, आणि समजलं, की मला मुलगा समजणारे “ते” बाबा बेवारस म्हणुन रस्त्यावर “मेले”!

हो, स्वर्गवासी होणं, कैलासवासी होणं आणि देवाघरी जाणं ही प्रतिष्ठितांची मक्तेदारी! “मेला” हा शब्द प्रतिष्ठा नसणारांसाठीच ठेवणीत ठेवलाय! ते मरुन गेले… आणि जातांना भिका-यांच्या डॉक्टरला जन्माला घालुन गेले! मी त्यांचा मुलगा म्हणुन जिवंत असुनही ते बेवारस म्हणुन गेले! ज्यांनी त्यांना रस काढून हाकलुन दिलं होत, त्यां लोकांत आणि माझ्यात फरक काय?

मी अंतर्मुख झालो! पुर्वी दिलेले त्यांचे विचार आता कानातुन मनात यायला लागले… Heart पासुन हृदयात यायला लागले! त्यांच्या विचारांचं मनन चिंतन व्हायला लागलं, माझ्याही नकळत! आणि या दिडशहाण्या सिकंदराची नशा पुर्ण उतरली!

जग जिंकण्यापेक्षा, जगातला “माणुस” जिंकावा किंवा माणुसकीचं “जग” जिंकावं! उतरलेल्या नशेनं हेच शीकवलं!

आणि, हा दिडशहाणा सिकंदर त्या गाढवावरून उतरला आणि १४ ऑगस्टला त्याने या इंटरनॅशनल संस्थेचा राजीनामा दिला.
आणि १५ ऑगस्ट २०१५  ला भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून तो रस्त्यावर आला!
स्वतःच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीतुन तो मुक्त झाला!
मीच आखुन घेतलेल्या पद-पैसा-प्रतिष्ठा या शर्यतीतुन मी स्वतंत्र झालो १५ ऑगस्ट २०१५ ला…
म्हणुन हा माझ्या दृष्टीने माझाही स्वातंत्र्य दिन!

या अगोदर असलेले सर्व दिवस माझ्यासाठी पैसा असुनही “दीन” होते…
१५ ऑगस्ट २०१५  नंतर ते पैसा नसुनही “दिन” झाले!

जवळचे लोक म्हणतात, “हरलास तु आभ्या!”

नाही!

शर्यतीत किती धावायचं? कसं धावायचं? यापेक्षा कुठं थांबायचं.? हे कळणं जास्त महत्वाचं! योग्य ठिकाणी हरावंच लागतं! कुठं आणि कधी हरायचं हे ज्याला कळतं तो कायम जिंकतो! कारण शर्यतीत धावणाराला हे कधीच कळत नाही… की शर्यत लावणारा स्वतः कधीच पळत नाही! एखाद्याला आपल्या पुढं जाताना बघुनही आपल्याला आनंद झाला तर समजावं… आपण आत्ता खरे “मोठे” झालो…बाकी वय बीय सारं झुठ!!!

वय फक्त केस पांढरे करण्यापुरतं येतं… जेव्हा ते मन शुभ्र करेल… तेव्हा त्याची किंमत! नाहीतर नुसताच तो गणितातला एक फालतु आकडा!!

दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.

१५ ऑगस्ट २०१५  ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता, अंगावरची झूल काढली होती. मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी! आज बरोबर या गोष्टीला सहा वर्षे पूर्ण झाली, म्हणून साधारण सहा वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे!

वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली वहायची म्हणुन भीक मागणा-या समुहासाठी मी काम करायचं ठरवलं. ते तर गेले… पण त्यांच्यासारखे अजुन खुप आहेत… त्यांतल्या एखाद्याला हात देवु, या विचारांतुन! या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.

सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती. मी भीक मागणारांमध्ये मिसळायचा प्रयत्न करु लागलो. सुरूवातीला लाज वाटायची! डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो. मुखवटा लावला होता! पण मला भीक मागणा-या लोकांनी त्यांच्यात सुरुवातीला येवू दिलं नाही.

त्यांना वाटायचं, हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन! (कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं) किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा!

डॉक्टर आहे हा xxx, गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल, रक्त विकेल, अजुन काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल… यांत आपण मरुन जाऊ… या डॉक्टरचा भरवसा काय? किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल, फसवुन “धंद्याला” लावेल. (मी अगोदर शरीरविक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो. शरीरविक्रय करणा-या या ताईंमध्ये माझी उठबस होती, काही लोकांना वाटायचं, हा माझा “धंदा” आहे, आणि मी मधला दलाल! भीक मागणाऱ्या समुहामध्ये हाच गैरसमज पसरला होता)

या सर्व गैरसमजापोटी, या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातली, धमक्या दिल्या, शिव्याही दिल्या. खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले, काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे! मी त्यांच्यात येवुच नये, यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे!

मी पूर्णपणे निराश झालो होतो.

या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं. मी पूर्णपणे निराश झालो! धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली. कुत्रं तरी बरं, त्याला कुणीतरी हाड् म्हणुन का होईना, तुकडा तरी टाकतं… मला ते ही मिळेना!

एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणुन नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते, नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो! या काळात भिक्षेक-यांपेक्षा वाईट अवस्था झाली माझी!

मी खरोखरचा बेरोजगार, बेनाम झालो होतो…

१४ ऑगस्ट पुर्वी लोक अपॉइंटमेंट घेवुन आदरानं भेटायला यायचे…
१५ ऑगस्ट नंतर भिक्षेकरी पण मला हाकलुन द्यायचे… माझ्यावर थुंकायचे!

किती विरोधाभास!

लाखोंचा पगार थांबल्यामुळे, माझं घर डबघाईला आलं. कालचा साहेब, आज भिकारी झाला! एका रात्रीत रावाचा रंक होतो… आणि रंकाचा रावही होवु शकतो… ही म्हण मला माहीत होती! मी रावाचा रंक झालो होतो, त्या काळात, एका भिका-यांचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं!

अशा परिस्थितीत, डॉक्टर मनीषा धावुन आली. अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य तीनं निभावलं! तीने आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला
आई-वडील, डॉक्टर पी. डी. सोनवणे आणि सौ. भारती सोनवणे यांनी मानसिक आधार दिला.
माझा भाऊ अमित सोनवणे आणि बहीण दिप्ती सोनवणे यांनी चोहोबाजुंनी आधार दिला!

पण तरीही मी पुर्ण ढासळलो होतो! आर्थिक आणि मानसिक!

यांतुनही मी रस्त्यांवर फिरायचो भिक्षेक-यांत. आणि मला ओळखणारे लोक मात्र माझी खिल्ली उडवायचे. “काय हो, महाराष्ट्र प्रमुख, आज रस्त्यावर कसे काय तुम्ही? खी. खी.. खी…” हसत लोक टोमणा मारायचे!
“एसी हाफीसात बसणारे तुमी… आज गटाराजवळ बसले, वास घेत गटाराचा… आरारारा… वाईट वाटतं बुवा तुमचं! खी.. खी… खी!”
“काय वो सर, आज भिका-यांत बसले तुम्ही.? काय पाळी आली राव तुमच्यावर! खी.. खी.. खी!”
“कशाचा सर रे तो? खी..खी… खी…”
हि, “खी… खी… खी…” मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही! मात्र या “खी… खी… खी…” ने इरादे अजुन मजबुत केले!

मित्र म्हणायचे, “काय बे आब्या, उतरली का रे मस्ती तुजी?”

“साल्या, लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, तु मोटा तीसमार खान निघालास होय? स्वतःला शाना समजतो का रे? एवढी मोठी नोकरी सोडलीस? मर साल्या आता, नोकरी सोडून जो शहाणपणा केला आहेस भोग त्याची फळं… त्याच लायकीचा आहेस xxxx तु!”
हि xxxx शिवी मनात रुतुन बसलीय, काट्यासारखी! हि शिवी मी मनात जपुन ठेवलीय… फ्रेम करुन आणि या फ्रेमवर मी खुप प्रेम करतो!

मी पुर्ण डिप्रेस झालो होतो, डिप्रेस करणारे माझेच होते!

बुडण्याचं दुःखं नसतं… मरण्याचंही नसतं, पोहता येत नाही याचंही दुःखं मुळीच नसतं… पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःखं!

मी या दुःखात बुडुन गेलो! तरीही निर्लज्जासारखं, मला हाकलून देणाऱ्या भिक्षेक-यांमध्ये मी रोज रोज जायचो. नाही नाही ते त्यांचं ऐकून घ्यायचो, त्यांच्या पोटभर शिव्या खायचो, रात्री झोप लागायची नाही, कारण शिव्याशाप खावुनही शेवटी पोट रिकामंच असायचं!

हे असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल ३१ महिने चाललं!

एकेदिवशी, अंगावर अक्षरशः किडे पडलेले, फुटपाथवर २४ वर्षे पडलेले एक आजोबा होते, त्यांच्या पाच फुटांवर सुद्धा कुणीही जात नसे. त्यांचं सर्व ड्रेसिंग करून, त्यांना स्वच्छ करून “आपलं घर” च्या विजय फळणीकर सरांकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं.

या बाबांना पूर्ण माणसात आणलं! ते गेले, तेव्हा त्यांचा मुलगा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कारही केले! भीक मागणाऱ्या समूहाने हे सर्व पाहिलं!

यानंतरही या भिक्षेकर्यानी मी भिक्षेक-यांसाठी केलेल्या अनंत गोष्टी दुरुन दुरुन पाहिल्या! आणि हळूहळू माझ्याबद्दलचं त्यांचं मत बदलत गेलं! “यार… हे सालं आपल्यातलंच हाय… ह्यो आपल्यासाटीच कायतरी करतोय!” इतकी साधी गोष्ट त्यांना कळायला ३१ महिने गेले होते… आणि हे त्यांना कळेपर्यंत मी पण ख-या अर्थानं भिकारी झालो होतो!

हळूहळू मला त्यांनी आपल्या मध्ये ऊठ-बस करण्याची मनापासुन परवानगी दिली.

ऑगस्ट २०१५ ते मार्च २०१८  अशी अडीच वर्षे मी फक्त त्यांच्यात मिक्स होण्यासाठी झुंजत होतो! हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता… खडतर होता! त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मला अडीच वर्षे झुंज द्यावी लागली.

या काळात त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सतत बसत असे, उठत असे, जेवत असे, खात असे! भिक्षेक-यांनी माझी अशी अडीच वर्षे कठोर परीक्षा पाहून मला त्यांच्यातला एक होण्याची संधी दिली! भिकारी होणंही इतकं सोपं नसतं तर! त्यासाठी पण परिक्षा असतात… MPSC आणि UPSC पेक्षा अवघड! यासाठीही कठोर परिश्रम असतात तर!!!

साधारण एप्रिल २०१८  पासून माझं डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून खऱ्या अर्थाने काम सुरू झालं.

डॉक्टर होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी किंवा एखादा ऑफिसर होण्यासाठी आधी तीन ते चार – पाच वर्षे कठोर अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतरच पदवी हातात मिळते. मी सुद्धा अडीच तीन वर्षे कठोर परिश्रम घेऊन भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मिळवली होती, उत्तम मार्कांनी मी पास झालो होतो!

होय… मी भिका-यांचा डॉक्टर झालो होतो!

हि पदवी मात्र एकदा हातात पडल्यानंतर, मी मागं वळून पाहिलंच नाही. सांगायला अभिमान वाटतो की, आज या भिक्षेकरी कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे. मला विचारल्याशिवाय आज कोणतीही गोष्ट आज यांच्यात होत नाही… यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा आज माझा शब्द शेवटचा धरला जातो. यांच्या पोरांची नावं मला विचारुन ठेवली जातात! पोरी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगतात, पण, आज भिक्षेकरी पोरी मला नी मनिषाला त्यांच्या आईअगोदर आम्हाला सारं सांगतात!

आम्ही आईबाप होवुन गेलो अशा पोरींचे… बीन बाळंतपणाची, मनिषा… आई झाली त्यांची! लगीन झालेली बाई, सर्व गोष्टीं आपल्या नव-याला, नायतर आपल्या बापाला सांगते… पोरी मलाच बाप समजाया लागल्या… आयशप्पत… मी पन्न्नास वर्षाच्या विवाहित पोरीचा पण बाप झालो! बापापेक्षा पोरगी वयानं मोठी… पण म्हटलं ना? वय हा फक्त एक आकडा! नातं महत्वाचं… आणि नात्याला वय नसतं!

भिक्षेक-यांच्या शंभराहुन अधिक पोरांची नावं आज “अभिजीत” आहेत…पन्नासाहुन अधिक पोरींची नाव आज “मनिषा” आहेत! कोणताही पुरस्कार फिका वाटतो मला यापुढं!
आज सहा वर्षानंतर माझं भिक्षेक-यांचं कुटुंब ११०० इतक्या लोकांचं आहे.
यात मला २०० ते ३०० इतके आईबाप आहेत, तितकेच आजी-आजोबा आहेत आणि या वयामध्ये मला आणि मनिषाला २०० ते ३०० पोरं सुद्धा आहेत!
आज जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मी असेन असं मला वाटतं!

या सर्वांशी मानसिक नाती जुळवता जुळवता ११०० भिक्षेक-यांना वैद्यकीय सुविधा देत आहोत. यांच्या, म्हणजेच आमच्या ५२ पोराबाळांचे शिक्षण करत आहोत, याहुन आनंद कोणता?

डोळ्यांना दिसत नसल्यामुळे या भिक्षेकरी आजीआजोबांचे रस्त्यांत अपघात होतात, यात त्यांचे जीव जातात, हातपाय मोडतात… ते टाळावे म्हणून अशा ९५० लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन आपण करून दिले आहेत आणि आता अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. रस्त्यावर बेवारस म्हणून कित्येक वर्षे खितपत पडलेल्या २२ आजी आणि आजोबांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून दिला आहे. ते तिथे माझे आई बाप – आजी आजोबा म्हणूनच राहतात. स्वतःचं नाव आणि आडनाव सुद्धा ते विसरून गेले आहेत. आता ते आडनाव सुद्धा “सोनवणे” म्हणुन लावतात! सोनवणे आडनावाला याआधी इतका सन्मान कधी मिळाला नव्हता! पण, आईबापाला आधार दिला म्हणुन स्वतःला सुदैवी समजु की आईबापाला वृद्धाश्रमात ठेवावं लागतंय म्हणुन स्वतःला दुर्दैवी समजु.?

या विचारांत आजही झोप लागत नाही मला!

हा भीक मागणारा समुह जर कष्टकरी झाला तरच समाज त्याला गावकरी म्हणून स्वीकारेल याची मला जाणिव झाली. भीक मागणारांना गावकरी बनवायचं हे ध्येय ठरवुन “भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी” हि आमच्या कामाची टॅगलाईन मी ठरवली!

माझ्या शब्दांना भिक्षेकरी गटामध्ये थोडी किंमत आहे हे कळल्यानंतर मी त्यांना भीक मागणं सोडायला प्रवृत्त केलं, आणि त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय सुचवण्यात सुरुवात केली. याला यश येऊन १०५ कुटुंबांनी भीक मागणं सोडलं आहे आणि हि कुटुंबं आज सन्मानाने जगत आहेत.

रस्त्यावर चालणार्‍या या कामांमध्ये मला अनेक व्यक्ती आणि संस्था यांची मदत झाली. पब्लिक चॅरिटी कमिशनर ऑफिस, इन्कम टॅक्स ऑफिस, महिला व बालकल्याण, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, लेले हॉस्पिटल, पोलीस डिपार्टमेंट, पुण्यातील नामांकीत संस्था आणि व्यक्ती! संस्थेतील बड्या अधिका-यांची नुसती भेट घेणं, “मुश्कील ही नही नामुमकीन है” तरीही हि मंडळी मला लहान पोरगं समजुन मला वेळ देतात… माझं ऐकुन घेतात… मदत करतात. मोठ्ठ्या खुर्चीतली ही सर्व माणसं माझ्यासाठी मुद्दामहुन छोटी होतात!

लहान बाळाबरोबर खेळतांना आपणही लहान होतो तसंच!
कसे ऋण फेडावे यांचे?

याच प्रवासात आपल्यासारखे सहृद भेटले आणि आपण माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून संस्थेला देणगी देण्यासाठी सुरुवात केली. मी सुद्धा या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी करत असलेल्या कामाचा सर्व लेखा-जोखा दर महिन्याला सर्व सहृदांना पाठवत असतो. मी करत असलेल्या कामाबद्दल सर्व बाबी प्रांजळपणे कळवतो आणि सल्ला सुद्धा घेतो.

यातून कामांमध्ये एक पारदर्शीपणा राहण्यासाठी खूप मदत झाली, शिवाय हे काम फक्त डॉक्टरच नाही तर आपलंही आहे हे समाजाला वाटायला लागलं!

न फेडता येणा-या आपल्या ऋणांत आहे मी, माझा साष्टांग नमस्कार स्विकारावा!

हे सर्व करत असताना मी भीक मागणा-या व्यक्तींच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांची सुखदुःख समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि यातूनच जन्म झाला माझ्या ब्लॉगचा!

भारतात आणि भारताबाहेर हे ब्लॉग पोहोचू लागले. शाबासकी मिळू लागली आणि या अशा शाबासकी ने माझा हुरूप आणखी वाढला. काही लोक माझे ब्लॉग स्वतःचे म्हणून त्यांच्या नावावर कॉपी करून पुढे पाठवतात. या गोष्टीचा मला मुळीच खेद नाही… पण खेद याचा वाटतो की ते फक्त माझे ब्लॉग कॉपी करतात माझं काम नाही! ब्लॉग कॉपी करण्याबरोबरच माझं काम जेव्हा ते कॉपी करतील तो दिवस माझ्या आनंदाचा!

जवळचे लोक मला नेहमी विचारतात, “आभ्या, इतकं सगळं करून तू काय कमावलंस?”
मी खूप काही कमावलंय…

आदरणीय सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांनी मला मुलगा म्हणून मला स्वीकारलं, हे पुत्रत्व मी कमावलं!
आदरणीय राणीताई बंग यांचा हात डोक्यावर मायेने पडला, तो मायेचा हात मी कमावला!
आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हूरूप देऊन सामर्थ्य दिले, हात धरून शक्ती दिली, ती शक्ती मी कमावली!
शास्त्रज्ञ आदरणीय रघुनाथ माशेलकर यांनी पोटाशी धरुन उच्चारलेले I am proud of you my child हे शब्द, या शब्दांतुन child असणं मी कमावलं!
सुपर कॉम्प्युटर चे जनक श्री. विजय भटकर म्हणाले होते, “मी कॉम्प्युटर बनवला, पण तू माणूस घडवतो आहेस!” मी हा “विजय” कमावला!
विश्वास नांगरे पाटील सर म्हणाले होते, “भारीच करतोय तु राव कायतरी, आयुष्यात कधी अडचण आली तर मला फोन कर… हा घे माझा पर्सनल नंबर…” हा “विश्वास” मी कमावला!

तुमच्यासारखे जवळचे लोक मी कमावले!

जन्माला येताना माकड म्हणूनच जन्माला आलो… परंतु भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून मी हळूहळू माणूस बनत गेलो… माणुस म्हणुन चेहरा मी कमावला!

“ते खरं रे आभ्या परंतु या बदल्यात तु गमावलंस किती?”
अरे हो, खरंच मी खूप काही गमावलं सुद्धा आहे…

ह्या कामानं मी, “मी” पणा गमावला!
आपण कुणीतरी आहोत याचा अहंकार मी गमावला!
केवळ स्वतःपुरतं जगायचं हा स्वार्थ मी याच कामा मध्ये गमावला!
स्वतःच्या चेहर्‍यावर लावलेला खोटा खोटा मुखवटा मी गमावला!
सर आणि साहेब यांची खोटी प्रतिष्ठा गमावली!

पोरा – लेकरा- बाळा या उबदार शब्दात मी विसावलोय आता…
मला खुर्चीपेक्षा… उकीरडा आवडायला लागलाय आता! मला उष्टं… खरकटं… शिळं… आणि नासकं जेवण आवडतं हल्ली आणि आवडत राहील, तोपर्यंत… जोपर्यंत माज्या भिकारी आईबापाला सन्मान मिळत नाही तोपर्यंत! माझा भिक्षेकरी जोपर्यत कष्टकरी होत नाही तोपर्यंत…तो गांवकरी होणार नाही तोपर्यंत!

माझ्या आईबापाला जेव्हा मी भिक्षेकरी म्हणुन स्वतंत्र करेन तोच माझा स्वातंत्र्य दिन असेल!

मी तर सारा लेखाजोखा मांडलाय…

आता अजुन कमवायचं राहिलं काय? आणि गमवायचं राहिलं काय?
माय बापहो, तुम्हीच निवाडा करा!

जयहिंद!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*